Sanjay Raut : राहुल धोत्रेची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्याची हत्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता, गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा सापडत नाही हा? तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो फरार असताना गिरीश महाजनांना जाऊन भेटतो. त्याला कोण वाचवत आहे? हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या जनआक्रोश मोर्चाच्या (Nashik Shiv Sena UBT MNS Morcha) सांगता सभेतून ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, हा जन आक्रोश मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होते? तर नेपाळ होतं, बांगलादेश होतो, हा इशारा देण्यासाठीच हा मोर्चा आहे. आता शिंदे गटाचे लोक मुंबई पोलिस आयुक्तांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीभेटले. त्यांचं म्हणणं आहे की, मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे पण झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचे उत्तर नाशिकमध्ये आहे. प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुले नशेच्या आहारी गेलेले आहेत. म्हणून लोक रस्त्यावर आले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
...तर तुम्ही राज्य करायला नालायक
संजय राऊत पुढे म्हणाले की, आमचा अंत पाहू नका. त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून मी मगापासून अस्वस्थ आहे. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा आहे. त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्याची हत्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता, गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा सापडत नाही हा? तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो फरार असताना गिरीश महाजनांना जाऊन भेटतो. त्याला कोण वाचवत आहे? हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
दोन्ही पक्षाचे कुळ आणि मूळ एकच
यापुढे नाशिकचे आणि राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार आहेत. आता काय एकत्र येणे बाकी आहे? दोन भाऊ, नेते कार्यकर्ते एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षाचे कुळ आणि मूळ एकच आहे. नाशिकमध्ये या लोकांचे 3,4 आमदार निवडून येणे शक्य आहे का? मते चोरून हे निवडून आलेत. आपल्यापुढे जे आव्हान आहे ते पेलण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
बाळा नांदगावकर म्हणाले की, ही तर सुरुवात आहे. आता फक्त नेतेमंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. सन्माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवत आहात. सगळ्याच जातींचे लोक आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊ. आपण मराठी म्हणून या ताकदीचा सर्वनाश करायला पाहिजे. ज्या नाशिकला दत्तक घेतले होते त्या नाशिकला काय मिळाले? केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार आहे. त्यामुळे नाशिककरांनी तुमच्यावर विश्वास टाकला की काहीतरी चांगलं होईल. पण, इथले उत्तम प्रकारचे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. खोटारडेपणाचा आता कळस झालेला आहे, असा हल्लाबोल त्यांनी भाजप सरकारवर केला.
आणखी वाचा