Nashik Uday Samant : सद्यस्थितीत रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery) विरोध करण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पसाठी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले होते. आता हेच लोक विरोध करत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसात वेदांता फॉक्सकॉनसह ज्या-ज्या विषयांवर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेतपत्रिका पुढील आठ दिवसात काढणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 


आज उदय सामंत (Uday Samant) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून दुसरीकडे बारसू रिफायनरी संदर्भांत स्थानिक लोकांनी आंदोलन छेडले आहे. अनेक महिलांनी आंदोलनात सहभागी होत रिफायनरीला विरोध दर्शविला आहे. मात्र दुसरीकडे उदय सामंत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. जी लोक या रिफायनरीला विरोध करत आहेत./ त्यांनीच या प्रकल्पाबाबत पत्र लिहल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यावेळी नाणार प्रकल्प होणार होता, त्यावेळी तेथील लोकांच्या तीव्र आंदोलनामुळे ती जागा बदलण्यात आली. त्यांनतर जवळच्या बारसू गावानजीक हा प्रकल्प उभारण्याचे ठरले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पत्र लिहून नव्या जागेबाबत पंतप्रधानांना कळविले असल्याचे सामंत म्हणाले. 


उदय सामंत यावेळी म्हणाले कि, रिफायनरीच्या कामात राजकारण केले जात असून जालियनवाला बाग ची तुलना केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच 12 जानेवारी 2022 ला पत्र लिहिले होते. यात बारसुमध्ये 1300 एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो, असे पत्र लिहिले होते. या पत्रात म्हटले होते कि, पर्यावरणचा ह्रास होणार नाही, राज्याचा जीडीपी वाढणार असे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहले होते. मात्र त्यावेळी कोणाशी चर्चा झाली, माहिती नाही, याबाबतचे ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या जागी शिंदे मुख्यमंत्री असते तर प्रकल्प कधीच पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


दरम्यान सेना भवनवर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये, असे म्हटले होते. आता यात राजकारण का? आता विरोध का होत आहे. याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, दुटप्पी राजकारण बंद झाले पाहिजे. सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्योग बाहेर गेले म्हणून सांगणारे आता उद्योग येत असताना विरोध का करत आहेत, याचे उत्तर दिले पाहिजे, असे सामंत म्हणाले. पत्र लिहण्यावर आक्षेप नाही, पण तर पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी आहे. शिवाय या प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी नांनार प्रकल्प रद्द केला, मग आता विरोध का? याचे उत्तर ठाकरे यांनी दिले पाहिजे, असा प्रश्न ठाकरे यांना केला.


कोणतेही आंदोलन सुरू नाही.... 


समृध्दीच्या बाबतीतही तेच होत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विट केले, ते गैरसमज होता. आता कोणतेही आंदोलन सुरू नाही. 12 तारखेच्या पत्रामुळे सर्वेक्षण सुरू आहे. पुढील 30/40 दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून हार्ड अँड फास्ट कुठलेही काम होणार नाही. सर्वेक्षणासाठी नाटे परिसरात बोअर मारून झाले म्हणजे तिथे विरोध नाही. एकूण 65 टक्के लोकांनीं समर्थन दिले आहे. सध्या माती परीक्षण केले जात असून प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही हे ठरवू, असे सूतोवाचही सामंत यांनी दिले. 


श्वेतपत्रिका काढणार 


दरम्यान शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या पाठीशी सरकार आहे. मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात एकही नियमबाह्य काम केले नाही, भविष्यात ही करणार नाही. वेदांता फॉक्सकोनसह ज्या ज्या विषयावर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेत पत्रिका पुढील आठ दिवसात काढणार आहे. डावोसला 1 लाख 37 हजार कोटी करार झालेत, त्याचे कामही सुरू झाले आहेत. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रला पहिल्या क्रमांकावर नेल्या शिवाय राहणार 
नाही असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.