Nashik Igatpuri Crime : नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धरवड येथील युवतीची हत्या करण्यात आली असून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने सदर वस्तीला आगही लावल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. 


इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील वस्तीतील 20 वर्षीय युवतीची जमावाकडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. पहाटे 03 वाजेच्या सुमाराला ही घटना घडली आहे. त्याचबरोबर वस्तीतील 03 कातकरी कुटुंबाची घरेही जाळून टाकण्यात आली आहेत. या घटनेने इगतपुरी तालुक्यातील खळबळ उडाली आहे. दहा ते वीस  जणांच्या टोळक्यांने हा प्रकार केल्याचे समजते. इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे या परिसरातील हे टोळके असल्याची माहिती आहे. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


दरम्यान घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधरवड येथील आदिवासी वस्तीमध्ये शरद महादू वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. वाघ कुटुंबियांचे बारशिंगवे येथील नागरिकांशी जमिनीबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. शुक्रवारी दुपारी या प्रकरणी बारशिंगवे भागातील 40 ते 50 जणांचे संतप्त टोळके लाठ्याकाठ्या आणि दांडके घेऊन कातकरी वस्तीत आले होते. 


यावेळी स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र पहाटेच्या वेळी ह्या टोळक्यातील 10 ते 20 जणांच्या वस्तीत प्रवेश करुन हाणामाऱ्या सुरु केल्या. यावेळी शरद वाघ यांच्यावर वार करीत असतांना न्यायडोंगरी ता. नांदगाव येथून आलेली त्यांची मेहुणी लक्ष्मी (20) ही सोडवायला गेली. मात्र तिच्या वर्मी घाव बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर टोळक्याने शरद महादू वाघ, शंकर ज्ञानेश्वर वाघ, अलका संजू वाघ या तीन कुटुंबाची घरे जाळून टाकली. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपासकार्य सुरु केले आहे.