Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो (ता. इगतपुरी) येथे करण्यात आले. 


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, रस्त्यांमुळे जिल्हा, राज्य व देशाचा विकास साधला जात असतो. या अनुषंगाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 520 कि.मी.चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबई ते नागपूर दरम्यान असणारा हा समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्यासाठी एक दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार - दादा भुसे


यावेळी दादा भुसे म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मुंबई ते नागपूर दरम्यान असणाऱ्या 701 कि.मी. लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामांपैकी 625 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी या 25 कि.मी. रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. 


अपघात टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग - दादा भुसे


या महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन व तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या महामार्गाचा वापर करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व वाहनाच्या वेगाचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित 76 कि. मी. मार्गाचे म्हणजेच इगतपुरी ते आमने येथील काम प्रगतीपथावर आहे. त्याच प्रमाणे या महामार्गावर उभारण्यात आलेल्या टोलनाका व इतर 18 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक नागरिकांचा रोजगाराच्या दृष्टीने समावेश करण्यासाठी प्राधान्य येणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे ते म्हणाले.


यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे सह व्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी तथा उप व्यवस्थापक विठ्ठल सोनावणे, तहसीलदार तथा व्यवस्थापिका रचना पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


असा आहे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे तिसरा टप्पा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी व पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज 13 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (200 मी लांबी), दारणा नदीवरील 1 मोठा पूल (450 मी), 8 छोटे पूल, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील 4 इंटरचेज, 14 टोलबूथ, 2 वे-ब्रिज, 1 टनेल-275 मी, 27 बॉक्स कल्वर्ट, 27 युटीलीटी डक्ट व पॅकेज 14 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (910 मी लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 कि.मी पैकी आता एकूण 625 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे.


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : कार्यक्रम स्थळावरून थोडा गैरसमज झाला, मी कुणावर नाराज नाही; मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती