Advay Hire Nashik Latest Marathi news Update : काही लोकांना लायकीपेक्षा जास्त मिळाले म्हणून सत्तेची मस्ती डोक्यात गेली. मी जन्माला आलो, तेव्हा माझी आजी मंत्री होती, आज मी शिवसेनेत आलो ते सत्तेसाठी आलो नाही तर इथल्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी, असा घणाघात शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी केला.


आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेना नेते अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता निशाणा साधला. यावेळी अद्वय हिरे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव हा हिरे घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे. शहरासह तालुक्यात अनेक कामे देखील हिरे घराण्याने केली आहेत. मात्र तुम्ही मागील वीस वर्षात किती धरणे बांधली ते सांगा, असा सवाल त्यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता केला.


हिरे पुढे म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने, बाजार समिती, जिल्हा बँक बांधण्याचे काम हिरे घराण्याने केले आहे. आम्ही जे काम केले, त्याची काय अवस्था केली.  याचे उत्तर पाहिजे. आज 100 कोटींचे रस्ते होत असून याचे श्रेय उध्दव ठाकरे यांना आहे. एमआयडीसीमध्ये भागीदारी पाहिजे म्हणून उद्योग येत नाही, असा घणाघात यावेळी हिरे यांनी केले. 


दादा भुसेंवर जोरदार टीका...
दादा भुसेंवर आरोप करताना ते म्हणाले की, 2017 ला हिंदुत्व सोडत मनपा निवडणूकमध्ये काँग्रेस बरोबर गेले. त्यामुळे गद्दारी करणे यांच्यां स्वभावात असून मुलाची खोटी शपथ घेतली. आज अशी अवस्था झाली की, आंदोलन करताना कार्यकर्ते उरले नाही. आज शहरात गुन्हेगारी वाढली आहे, त्या विरोधात करावाई झाली नाही. पोलीस षंढ सारखे बघत होते, अशी अवस्था मालेगाव शहराची झाल्याचे सांगत जोरदार टीका अद्वय हिरे यांनी केली.


तुमचा नेता म्हणजे भारत नाही - उद्ध ठाकरे


तुमचा नेता म्हणजे  भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला लगावला.  मोदी म्हणजे भारत, तुम्हाला मान्य  आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यांच्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले होते का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. भाजप म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असल्याची टीका त्यांनी केला. कोणाच्या मुलांच्या, पत्नीवर आरोप करतात. मात्र यांच्या नेत्यांवर, कुटुंबियांवर आरोप केल्यावर परराज्यात जाऊन अटक करतात. आम्ही तुमच्या घरापर्यंत जात नाही कारण आमचे हिंदुत्व आहे. तुम्ही विरोधकांच्या घरात जाता. लालूप्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करता, अनिल देशमुख यांच्या सहा वर्षाच्या नातीची चौकशी करता, असा संतप्त सवाल उद्धव यांनी केला.