Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गानं हिमायतनगर गाठावं लागत आहे. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. 


हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळं जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं  आहे. वडगाव जवळील पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.


वडगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची भिस्त असलेला सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफलो झाला आहे. गाव परिसराला पुराच्या पाण्यामुळं वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढवण्यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कॅनॉल असून, उजवा कॅनॉल 12 किलोमीटरचा तर डावा कालवा 6  किलोमीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2 हजार 840 मीटर आहे. आज घडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्यानं कॅनॉल दुरुस्ती झाली नसल्यानं व्यवस्थावपन बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडत आहे.
 
दरम्यान, सुना तलावाच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामुळं वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्यानं मुसळधार पावसामुळं पाणी नाल्यावरुन वाहू लागलं आहे. त्यामुळं गेल्या दोन दिवसापासून गावचा संपर्क तुटला आहे. गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी  ग्रामस्थांकडून केली जात आहे.


महत्वाच्या बातम्या: