Vidarbha Rains : सुरुवातीला कमजोर ठरलेल्या पावसाने (Rain) जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्व उणीव भरुन काढली आहे. विदर्भातील (Vidarbha) नऊ जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. केवळ अमरावती आणि अकोल्यात पाऊस सरासरीपेक्षा खाली असला तरी सामान्य आहे. विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे, या कालावधीत 446 मिमीच्या अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
विदर्भात 27 जुलैपर्यंत झालेला पाऊस
शहर मिमी सरासरी टक्के नागपूर 485 441 7 गडचिरोली 665 584 16 चंद्रपूर 595 495 18 भंडारा 620 489 25वर्धा 420 398 03गोंदिया 560 555 01 यवतमाळ 519 394 36अमरावती 327 374 उणे 13अकोला 330 333 उणे 3बुलढाणा 307 297 03वाशिम 404 379 07
| शहर | मिमी | सरासरी | टक्के |
| नागपूर | 485 | 441 | 7 |
| गडचिरोली | 665 | 584 | 16 |
| चंद्रपूर | 595 | 495 | 18 |
| भंडारा | 620 | 489 | 25 |
| वर्धा | 420 | 398 | 03 |
| गोंदिया | 560 | 555 | 01 |
| यवतमाळ | 519 | 394 | 36 |
| अमरावती | 327 | 374 | उणे 13 |
| अकोला | 330 | 333 | उणे 3 |
| बुलढाणा | 307 | 297 | 03 |
| वाशिम | 404 | 379 | 07 |
Buldhana Rains : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी, आलेवाडी गावात शिरलं अनेक घरात पाणी
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रात्री पुन्हा अतिवृषटीमुळे अनेक नदी ओढ्याना पूर आल्याने नागरिकांनी जीव मुठी धरुन रात्र काढल्याच चित्र आहे. संग्रामपूर परिसरात सातपुडा डोंगर परिसरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला. तालुक्यातील पांडव नदीसह अनेक ओढ्यांना पूर आल्याने शेगाव जळगाव जामोद मार्ग काही काळ बंद होता तर आलेवडी गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घर जलमय झाले होते. आलवाडी ग्रामपंचायत इमारतीत दोन ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठ नुकसान झालं आहे. तर काही कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
Gadchiroli Rains : तेलंगणातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून विसर्ग, गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याला फटका बसणार
तेलंगणा राज्यात ढगफुटीसारखा 600 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या भूपालपल्ली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो घरे पाण्याखाली आली आहेत. तेलंगाणा राज्यातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. त्याचा फटका हा थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला बसणार आहे. सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदी आहे आणि या पुराचे पाणी आता गोदावरीला येऊन मिळणार आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात जिल्हाधिकारी संजय मीना यांनी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. वॉर रुममधून याकडे लक्ष ठेवून आहे. काल मध्यरात्रीच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील असरल्लीमध्ये 164.8 मिमी इतका पाऊस पडला. तालुक्यातील 4 गावांतील 330 लोकांना सुरक्षित स्थळी हवण्यात आले आहे.
Bhandara Rains : भंडाऱ्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह रात्रभर जोरदार पाऊस
हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मात्र, दिवसभर प्रखर ऊन आणि उकाडा असल्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पहाटेपर्यंत कुठे हलका तर कुठे रिमझिम सुरु आहे. रात्रीच्या जोरदार पावसाने भंडाऱ्यातील बैरागी वाडा परिसरातील सखल भाग जलमय झाला होता. पाऊस कमी झाल्याने आता पाणी ओसरलं आहे.