नागपूर : दिवसागणिक घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा घटनांमुळे राज्यात 'क्राईम कॅपिटल' अशी ओळख असलेल्या नागपुरात चार दिवसात दहा जणांची हत्या झाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या खुनाची थरारक घटनेचाही समावेश आहे. मात्र, इतर घटनांकडे पाहता नागपुरात गेले काही दिवस शांत असलेले गुंड पुन्हा डोकं वर काढत आहेत का? नागपूरचे पुन्हा गुन्हेपूर होत आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनांमुळे नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिलासादायक बाब म्हणजे बहुतांश प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दहापैकी आठ खून नागपूर शहरात तर दोन खून नागपूर जिल्ह्यातील कुही आणि उमरेड या ग्रामीण भागात झाले आहेत.


*पहिली घटना* - नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगापूर चौकात 20 जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शुभम ठवकर या ट्रक चालकाची हत्या करण्यात आली. दोन आरोपींनी दगड, विटा, फरशीने शुभमवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचाराआधीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी शोएब उर्फ जॉनी शाहिद शेख आणि विक्रांत ऊर्फ विकी महेंद्रसिंग चंदेल या दोन आरोपींना अटक केली. मृत शुभम आणि शोएब हे दोघेही ट्रक चालक असून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण आणि मारामारी झाली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी शुभमची हत्या केली.


*दुसरी घटना* - दुसरी घटना 20 जून रोजी कुही तालुक्यातील मांगली शिवार इथे उघडकीस आली. वकील ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह फार्महाऊसमध्ये दिसून आला. लगेच घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा फुले यांच्या शेतावर काही दिवसांपूर्वी अविनाश नरुळे हा ट्रॅक्टरचालक काम करत होता. मात्र, तो डिझेल चोरी करायचा म्हणून त्याला कामावरुन कमी करण्यात आलं होतं. अविनाशने राकेश महाजन याच्यासोबत संगनमत करुन नरेशचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपींना माहिती मिळाली होती की वकील ज्ञानेश्वर फुले हे मोठी रक्कम फार्महाऊसमध्ये ठेवतात, तिच लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी नरेशचा खून करुन तब्ब्ल 37 लाख 65 हजारांची रोकड लुटली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन 37 लाख 40 हजार रुपये जप्त केले.


*तिसरी घटना* - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिसरी घटना 21 जून रोजी उघडकीस आली. त्यात संपत्तीच्या वादातून पुतण्या आणि त्याच्या पत्नीने काकाची हत्या केल्याचं उघड झालं. नामदेव लक्ष्मण निनावे असं मृत इसमाचे नाव असून नितीन निनावे आणि त्याची पत्नी माधुरी निनावे अशी आरोपींची नावं आहेत. काका नामदेव आणि पुतण्या नितीन एकाच घरात राहायचे. संपत्तीच्या विषयावर त्यांच्यात रोज वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात असाच वाद झाला, तेव्हा मृत नामदेवने नितीनच्या मुलाची गळा आवळून खून करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे संतापलेल्या नितीनने काकांच्या डोक्यावर काठीने वार करुन त्यांचा खून केला. पाचपावली पोलिसांनी नामदेव निनावे यांच्या खून प्रकरणात नितीन आणि त्याची पत्नी माधुरीला अटक केली.


*चौथी घटना* - तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात घडली. अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन आरोपीने आत्महत्या केली होती. आरोपी आलोक मातूरकर हा टेलर होता आणि रेडिमेट गारमेंट शॉप्ससाठी तो कपडे शिवण्याचे काम करायचा. मात्र, मेहुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आलोकचे कुटुंब आणि मेहुणीचे कुटुंबात वाद सुरु होते. तसंच आलोक आणि त्याची पत्नी विजया यांच्यातही खटके उडायचे. घटनेच्या दिवशी मध्यरात्री आलोकची सासू लक्ष्मीबाई त्याच्या घरी आलेली असताना आरोपीने सासूचे घर गाठून मेहुणीला गाठलं. सुरुवातीला दोघांमध्ये गप्पा झाल्या. नंतर अचानक आलोक हिंसक झाला आणि त्याने मेहुणीचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्याने तिथेच पोहोचलेल्या सासूची आणि नंतर रात्री उशिरा स्वतःच्या घरी जाऊन पत्नी विजया, 14 वर्षीय मुलगी परी आणि 12 वर्षीय मुलगा साहिलचीही हत्या केली. पहाटेच्या सुमारास आरोपी आलोकने स्वतः देखील आत्महत्या केली.


*पाचवी घटना* - नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर भागात घडली. योगेश धोंगडे या 30 वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधांची शंका आणि जुगाराच्या जुन्या वादातून हत्या करण्यात आली. गोलू धोटे नावाच्या स्थानिक गुंडाला मृत योगेशचे आपल्या पत्नीसोबत संबंध आहेत अशी शंका होती आणि त्याच शंकेतून गोलू दोन दिवसांपासून योगेश चा शोध घेत होता. घटनेच्या दिवशी गोलूने योगेशच्या घरावर हल्ला केला. मात्र, योगेश पळून गेला. गोलू आणि त्याच्या साथीदाराने योगेशला जवळच्या नाग नदीच्या पात्रात घेरले आणि अनेकांच्या देखत धारधार शस्त्राने त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे नागपूर शहराच्या मध्यभागी वसलेली शिवाजी नगर झोपडपट्टी आणि अवतीभवतीचा नाग नदीच्या किनाऱ्यावरील परिसर अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहे. इथे संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणावर जुगार आणि इतर अवैध कारभार चालतात. 


*सहावी घटना* - हत्येची सहावी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत भीमसेना नगरात घडली. 22 जूनच्या रात्री अक्षय लांडगे आणि त्याच्या साथीदारांनी शेषराव बनसोड या तरुणाची हत्या केली. एक महिन्यांपूर्वी मृतक शेषराव बनसोड आणि अक्षय लांडगे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शेषराव बनसोडला पोलिसांनी अटक करत एक महिना तुरुंगात ठेवले होते. नुकताच तो तुरुंगातून सुटून आल्यानंतर जुना वचपा काढण्यासाठी अक्षय लांडगे त्याला शोधत होता. 22 जूनच्या रात्री त्याने शेषराव यांच्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं होतं. तेव्हा पोलिसांनी अक्षय लांडगे आणि सहकाऱ्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. काल रुग्णालयात शेषरावच्या मृत्यू झाल्यानंतर अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.   


नागपूर गुन्हेगारी आणि खासकरुन थरारक हत्याकांडांसाठी ओळखलं जातं. मात्र, गेले काही महिने शांत असली नागपूरची गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत असून गल्लीबोळात राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे आणि त्यामुळे वस्त्यांमध्ये रोज होणारे छोटे छोटे भांडणतंटे कारणीभूत असल्याचं अनेकांना वाटत आहे. असं असले तरी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ठोस कारवाई दिसून येत नसल्यामुळे नागपूर पुन्हा अशांत होताना दिसत आहे.