नागपूर : शिवसेना प्रणित युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षाचं खंडणी प्रकरण ताजं असताना आता शिवसेनेच्या शहर प्रमुखावर धमकावून खंडणी मागणे, संपत्तीवर अवैध कब्जा करणे, ती रिकामी करण्यासाठी पुन्हा खंडणी मागणे, दुकान आणि फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणे असे अनेक आरोप लागले आहे. मंगेश कडव असं आरोप लागलेल्या शिवसेना शहर प्रमुखाचं नाव असून तो सध्या फरार आहे.


सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांवर सध्या नागपुरात गुन्हे दाखल होण्याची जणू मालिकाच सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना प्रणित युवासेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठौडच्या विरोधात अजनी पोलीस स्टेशनमध्ये एका फायनान्स कंपनीच्या संचालकाकडून 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप लागला होता. ते प्रकरण थंड होत नाही त्याच्या आधीच शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव अडचणीत सापडले आहे. मंगेश कडवच्या विरोधात नागपूरच्या अंबाझरी, सक्करदरा, हुडकेश्वर, बजाजनगर पोलीस स्थानकात गेले अनेक दिवस तक्रारी येत होत्या. पोलिसांनी सर्व तक्रारींचा तपास करून तीन प्रकरणांमध्ये मंगेश कडव याच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.


शिवसेना नागपूर शहर प्रमुखाविरोधात दाखल झालेले गुन्हे


प्रकरण पहिले - पुराणिक लेआऊटमध्ये एका घराचा अवैध ताबा घेतला. ताबा सोडण्याच्या मोबदल्यात मूळ मालकाला मारहाण करत त्याच्याकडून दीड कोटींची खंडणी मागितली. या प्रकरणी अंबाझरी पोलीस स्थानकात मारहाण करत खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.


प्रकरण दुसरे - मानेवाडा परिसरात तीन दुकानं खरेदी करण्यासाठी देवा शिर्के या तक्रारकर्त्याने 18 लाख रुपये दिल्यानंतरही मंगेश कडवने दुकानाचे विक्रीपत्र केले नाही आणि परस्पर त्याचं दुकान बँकेत गहाण ठेऊन बँकेतूनही 50 लाखांचं कर्ज उचललं. याप्रकरणी सक्करदरा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुंडा दाखल आहे.


प्रकरण तिसरे - मानेवाडा परिसरातील एका फ्लॅटच्या विक्रीमध्ये मंगेश कडवने फसवणूक केल्याची तक्रार दिनेश आदमने नावाच्या तक्रारकर्त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर तपास करत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय अनेक प्रकरण पोलिसांच्या तपासात असल्याची ही माहिती आहे...


दरम्यान, शिवसेनेने त्याच्या पदाधिकाऱ्यांवर लागत असलेल्या आरोपांवर सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांनी जरी गुन्हे दाखल केले असले तरी सध्या तपास सुरु आहे. कायदा आपलं काम करेल असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान यामागे कोणाचा कट कारस्थान आहे का असा संशय ही शिवसेनेनं व्यक्त केला आहे.


गेले अनेक वर्ष भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला उपराजधानीतील राजकारणात फारसे वाव नव्हते. मात्र शिवसेना आणि भाजपची वाट वेगळी झाल्यानंतर शिवसेनेने नागपुरात आपला विस्तार करण्याची संधी निर्माण झाली. पक्षाने तसे प्रयत्नही सुरु केले. मात्र पक्षाच्या काही नेत्यांवर लागणारे असे गंभीर आरोप उपराजधानीत शिवसेनेची वाट आणखी बिकट करणारे आहे.