नागपूर:  दशकभर शांतता असलेल्या मणिपूरमध्ये (Manipur Violence) अचानक हिंसा कशी उफाळली असा सवाल सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत भावना भडकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार, मात्र समाजाने अशा गोष्टींपासून दूर राहावं असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. विकासाचे मुद्दे लक्षात घेऊनच मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मोहन भागवतांनी  केलेल्या भाषणात  अप्रत्यक्षपणे इंडिया आघाडीवर  हल्ला केला आहे.मोहन भागवतांच्या भाषणातील  दहा महत्वाचे मुद्दे 


जी-20 परिषदेत जगभरातून भारताच्या आदरातिथ्याच कौतुक


आपला देश G-20 नावाच्या प्रमुख राष्ट्रांच्या परिषदेचा यजमान होता. वर्षभरात भारतात अनेक ठिकाणी राष्ट्राध्यक्ष, मंत्री, प्रशासक आणि सदस्य राष्ट्रांच्या महानुभावांचे अनेक कार्यक्रम झाले. भारतीयांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा अनुभव, भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील रोमांचक प्रवासाने सर्व देशांतील सहभागी अत्यंत प्रभावित झाले.


सर्वच क्षेत्रात देश प्रगती करत आहे


प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंनी 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 107 पदकांची कमाई करीत प्रथमच 100 हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांनाच प्रोत्साहित, आनंदित केले आहे. त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 'चांद्रयाना'च्या निमित्ताने उदयोन्मुख भारताच्या शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकही जगाने पाहिली आहे. इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. सर्व भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे काम ज्या शास्त्रज्ञांनी  पूर्ण केले त्यांचे आणि त्यांना बळ देणाऱ्या नेतृत्वाचे, देशभर सर्वत्र कौतुक होत आहे.


22 जानेवारीला देशात धार्मिकतेचे वातावरण असावे


राष्ट्राचे जागतिक दायित्व सिद्धीस नेणाऱ्या राष्ट्रीय आदर्शांतूनच संपूर्ण राष्ट्राच्या पुरुषार्थाचा उगम होतो. त्यामुळेच आपल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीत एका पानावर ज्यांचे चित्र आहे, असे धर्माचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या श्रीरामांच्या बालस्वरूपातील प्रतिमेचे मंदिर अयोध्येत उभारले जात आहे. येत्या 22 जानेवारीला त्या मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरात छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करावे


देश संकटाच्या उंबरठ्यावर


अलीकडे आपण हिमालयीन प्रदेशात हिमाचल आणि उत्तराखंडापासून सिक्कीमपर्यंत सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा जीवघेणा खेळ आपण पाहत आहोत. या घटनांमुळे भविष्यात काही गंभीर आणि व्यापक संकट येण्याची शक्यता असल्याची शंकाही व्यक्त होत आहे. मनाला वाटेल विकास योजना राबवण्यात आल्या. या गोंधळाचा परिणाम म्हणून हा प्रदेश आणि त्यामुळे संपूर्ण देश संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. विकासाच्या मार्गांमुळे मानवता आणि निसर्ग हळूहळू पण निश्चितपणे विनाशाकडे वाटचाल करत आहेत. जगभरात ही चिंता वाढली आहे. त्या अयशस्वी वाटांचा त्याग करून किंवा हळूहळू त्यांना मागे सारून, भारतीय मूल्ये आणि समग्र एकात्म दृष्टीवर आधारित स्वतःचा विकास मार्ग भारताला तयार करावा लागेल, जो काळाशी सुसंगत आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत असेल.


इंडिया आघाडीवर नाव न घेता टीका 


देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच आत्मविस्मृत होऊन विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आणि स्वार्थ, मत्सर अन् द्वेषाच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेला आहे. त्यामुळेच या राक्षसी शक्तींना समाज किंवा राष्ट्र तोडू पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींचाही सहज पाठिंबा मिळतो.


 मणिपूरमध्ये अचानक हिंसा कशी उफाळली  


मणिपूरची सद्यस्थिती पाहिली तर ही गोष्ट लगेच लक्षात येते. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का?आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला? वर्षानुवर्षे सर्वांची समान दृष्टीने विनाकारण सेवा करत असलेल्या संघासारख्या संघटनेला खेचण्याचा प्रयत्न का केला जात आहे. देशात मजबूत सरकार असूनही कोणाच्या जोरावर, ताकदीवर हा हिंसाचार इतके दिवस अव्याहतपणे सुरू आहे? गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेली शांतता कायम ठेवण्याचे काम राज्य सरकार करत असतानाही हा हिंसाचार का सुरू झाला आणि कोणी सुरु केला ?  


एकतेची त्रीसूत्री


अलीकडेच आपण आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांचे स्मरण केले. आपल्या धर्माचे, संस्कृतीचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करणारे, त्यात वेळोवेळी आवश्यक सुधारणा करून त्याचा मान वाढवणारे हे महापुरुष आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहेत. हे तीन घटक (मातृभूमीबद्दलची भक्ती, पूर्वजांचा अभिमान आणि सर्वांची समान संस्कृती) जी आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या भाषा, प्रदेश, पंथ, संप्रदाय, जात, पोटजाती इत्यादी सर्व विविधतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारी मातृभूमीची भक्ती, पूर्वजांविषयीचा अभिमान आणि समान संस्कृती ही तीन तत्वेच आमच्या एकतेचे  सूत्र आहे. 


 हिंसा भडकवणारे "टूल किट" सक्रिय


 ज्या शक्ती आम्हाला एकमेकांत लढवत ठेवून देश तोडू पाहत आहेत ते याचा पुरेपूर फायदा घेतात. त्यामुळेच एखादी छोटीशी घटना देखील अवास्तव मोठी करून बघता बघता मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाते. देशविदेशातून चिंता व्यक्त करणारी आणि इशारा देणारी विधाने प्रचारित केली जातात. हिंसा भडकवणारे "टूल किट" सक्रिय केले जातात आणि परस्पर अविश्वास आणि द्वेष आणखी वाढविले जातात.  


योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय


कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत आपण अडकू नये. प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजात सत्य आणि आत्मीयता पसरवण्यासाठी व्हायला हवा. सुसंघटित सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे. 


निवडणुकीत जनतेला सावध राहण्याचं आवाहन 


येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. 


प्लास्टिकला व्यवहारातून दूर करा


आपल्या घरातील पाण्याची बचत करून, प्लास्टिकला व्यवहारातून दूर करून आणि आपल्या अंगणात तसेच आजूबाजूला हिरवळ वाढवून निसर्गाशी आपले नाते जपावे. आपल्या व्यवहारात, आचरणात स्वदेशीचा स्वीकार करून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता वाढीला हातभार लावावा. 


स्वदेशीचा आग्रह धरा


देशात रोजगार वाढला पाहिजे आणि देशाचा पैसा देशातच वापरला गेला पाहिजे. म्हणूनच स्वदेशीच्या आचरणाची सुरवात आपल्या घरापासूनच व्हायला व्हावी. कायदा व सुव्यवस्था तसेच नागरी कर्तव्यांचे कसोशीने पालन करायला हवे. आणि समाजात परस्पर सद्भाव, सौहार्द व सहकार्याची प्रवृत्ती सर्वत्र रुजली पाहिजे. या पाच गोष्टी सर्वत्र व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून ती आचरणात आणून ही वागणूक आपल्या स्वभावात रुजविण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.