नागपूर : पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. तत्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही. पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असेल तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी हेच आदर्श आहेत असं ते म्हणाले. ते नागपूरात 'युगंधर शिवराय नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ' या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले की, "शिवाजी महाराजांनी भरीव काम करून ठेवलं आहे. त्यामुळेच डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या संघाच्या पहिल्या तीनही सरसंघचालकांनी वेगवेगळ्या काळात हे सांगून ठेवले आहे की संघाचे काम जरी तत्वरूपी असले आणि संघ व्यक्तिवाद मानत नसला, तरी काही साकार आदर्श लागतातच. त्यासाठी पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाय दुसरे आदर्श नाहीत."
शिवाजी महाराजांमुळे परकीय सत्तेची सद्दी संपली
आज अडीचशे वर्षानंतरही शिवाजी महाराज हेच प्रेरणा आणि आदर्श आहेत असे मोहन भागवत म्हणाले. सिकंदरपासून देशात एकानंतर एक परकीय आक्रमण होत असताना आणि इस्लामिक आक्रमणात सर्व काही उद्ध्वस्त होईल अशी स्थिती असताना शिवाजी महाराजांनी उपाय दिला. शिवाजी महाराज आग्र्यातून सुखरूप परत येतील की नाही अशी सर्वांना शंका असताना, महाराज परत आले. राज्य पुन्हा बळकट केलं आणि त्यानंतरच भारतात परकीय सत्तेची सद्दी संपली आणि बुंदेलखंड, राजस्थान, मुघलांपासून मुक्त झाले असे मोहन भागवत म्हणाले.
भारताच्या सतत पराजयाचे युग बदलले, शिवाजी महाराजांनी ते बदलले आणि ही स्थिती पुढेही कायम राहावी यासाठी जे काही करावे लागत होते ते सर्व शिवाजी महाराजांनी करून ठेवले होते. म्हणूनच शिवाजी महाराज तेव्हापासून आजपर्यंत आपले आदर्श आहेत असे मोहन भागवत म्हणाले.
ही बातमी वाचा: