नागपूरः कामठी तालुक्यातील खसाळा राख बंधारा (Ash Pond) फुटीच्या घटनेची चौकशी करताना उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांनी स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता राजेश कराडे, अधीक्षक अभियंता शिरीष वाट यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 133 अंतर्गत निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे खसाळा राख बंधारा 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फुटला असता राख मिश्रित पाण्याचा अचानक पूर आला. हे पुराचे राख मिश्रीत पाणी खसाळा, म्हसाळा, कवठा, सुरादेवी या गावांमध्ये शिरुन घरांचे, शेतकऱ्यांच्या शेतपीकांसह रस्ते व सिंचन कालव्याचे नुकसान झाले होते. याबाबत मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांचे लेखी म्हणणे समाधानकारक नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.


Nagpur municipal corporation elections 2022 : आरक्षणाचा माजी महापौरांना फटका, संदीप गवई, ग्वालवंशींना शोधावा लागणार प्रभाग


घटनेला निष्काळजीपणा कारणीभूत


तपासादरम्यान राख बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुख्य अभियंत्याच्या वतीने संबंधित ठेकेदाराला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. मुख्य अभियंता यांच्या वतीने आदेशाच्या प्रतीमध्ये कंत्राटदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते, हे विशेष. मौजा म्हसाळा येथील 12 घरांची पडझड झाली. 25 शेतकऱ्यांचे 4,42,035 चे नुकसान, शेतकरी फुलचंद बरबटकर यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. खैरी गावात पाणीपुरवठा योजनेच्या 2 विहिरींमध्ये राख मिश्रित पाणी शिरल्याने 4 मोटारपंप, पाइपलाइन, सोलर प्लांटचे नुकसान झाले. म्हसळा-कोराडी सुरादेवीला जोडणारा 2.50 कि.मी. रस्ता, म्हसाळा अंतर्गत 2.50 कि.मी.चा गाव रस्ता, सुरादेवी कवठा ते 4 कि.मी.चा रस्ता, म्हसळा ते खैरी आरोग्य उपकेंद्राला जोडणारा 1 कि.मी. अंतराचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. ही सर्व खराब झालेली कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्य अभियंता राजेश करडे यांना देण्यात आले आहेत. कालवा दुरुस्तीचे आदेशही दिले आहेत. यासोबतच राखेचा बांध मजबूत करण्यासही सांगण्यात आले आहे.