मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचं एक सूचक वक्तव्य आलंय. देवेंद्र यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसंच माजी मुख्यमंत्रीपदही अल्पायू आहे. ही दोन्ही पदं अल्पायू आहेत, असं त्यांनी म्हटल्याने नवीन चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री रहाणार नाहीत, असं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद मिळणार की, ते राज्यातील सत्ताकेंद्रात पुनरागमन करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.


नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा भैय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते.

एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या भेटीगाठी घेतल्या तर दुसरीकडे संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात विरोधी पक्ष नेता हा विषय जास्त दिवसांचा नाही, असं भैय्याजी जोशी म्हणाले आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री हे पद ही त्यांच्या जीवनात अल्पायु आहे. हे दोन्ही ही पद अल्पायु आहे, असं सूचक वक्तव्य भैयाजी जोशी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांनंतर जनमताचा कौल हा महायुतीलाच मिळाला होता. मात्र शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून काडीमोड झाला. त्यानंतर भाजपाने अजित पवारांची साथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथही घेतली. मात्र हे सरकार अवघं 72 तास चाललं. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांची साथ सोडल्याने फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

संबंधित बातम्या : 

भाजप म्हणजे हिंदू समाज नाही; संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशींचं वक्तव्य