नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करा, अशी अजब मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य घेता आले नाही.


यावर बोलताना नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्य कमी झाले आहे. शिवाय भाजपच्या जागा ही कमी झाल्या आहेत.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे आशिष देशमुख म्हणाले. शिवाय प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारण्यात आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना आधीच्या तुलनेत जास्त मोठी जबाबदारी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे अशी अजब मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

एवढेच नाही तर आशिष देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठेऊन महाआघाडीने निवडणूक लढल्या असत्या तर त्याचा फायदा झाला आता असेही मत व्यक्त केले. लवकरच विदर्भात पराभूत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करू असे ही त्यांनी जाहीर केले.