नागपूर : विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनात (Assembly Winter Session 2023) विदर्भाच्या (Vidarbha) चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशाचा आजचा शेवटचा असून नागपुरात (Nagpur) हे अधिवेशन भरवण्यात आले. परंतु अंतिम आठवड्यातील प्रस्ताव हा विदर्भाच्या विकासावर दिला जातो, तो यंदाच्या अधिवशेनात दिला गेला नाही आणि तो विरोधी पक्षांनी मांडला नाही, असं उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत मात्र ते सभागृहाच्या बाहेर बोलतात, विधानसभेतील भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. विरोधकांना विदर्भाचा विसर पडलाय हे अत्यंत खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांचं ऐकावं  लागतं तसं तुम्हीही ऐकलं पाहीजे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. 


विदर्भावर विरोधकांनी प्रस्ताव मांडला नाही - देवेंद्र फडणवीस 


विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नाही. अंतिम आठवड्यात विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव दिला जातो. ⁠विरोधी  पक्षनेते आणि नाना पटोले यांनी तरी प्रस्ताव मांडला पाहिजे होता. ⁠उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाही मात्र सभागृहाच्या बाहेर बोलतात. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला हे खेदजनक आहे. आम्हाला आमच्या अध्यक्षांच ऐकावं लागतं. तसंच तुम्हीही ऐकलं पाहिजे. ⁠हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते यांनी मांडला पाहिजे होता. मात्र त्यावरही अन्याय करण्यात आला. 


ललित पाटीलचा कारखाना 2020 साली सुरु झाला - देवेंद्र फडणवीस


ललित पाटील याचा कारखाना 2020 साली सुरु झाला असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की, तुम्ही विसरला असला तरी आम्ही नाही विसरलो. नाना पटोले ड्रग्स संदर्भात बोलले. गुजरात नंतर महाराष्ट्र काय सुरु आहे, हे ही सांगितलं. ⁠सर्वात मोठी कारवाई महाराष्ट्रात केली गेली आहे. 24 हजार लोकांवर कारवाई करण्यात आली. मागे कारवाई ही 5 हजार लोकांवर केली होती. पण आम्ही कारवाईचं प्रमाण वाढवलं. ललित पाटील प्रकरणात कृष्ण प्रकाश यांचं पत्र मी  वाचून दाखवलं आहे. 


पोलिसांची अभुतपूर्व भरती करण्यात आली - देवेंद्र फडणवीस


पोलिसांची संख्या कमी आहे, असं सांगितलं जातं. मात्र यावर्षी अभूतपूर्व भरती करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. तसेच पोलिसांच्या प्रशिक्षणाची मर्यादा देखील वाढवली. दरम्यान पुढच्या वर्षाची देखील भरती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पण ज्या पोलिसांची भरती करण्यात त्यांच्या प्रशिक्षणासाठी वेळ हवा असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे, त्यामुळे आता पोलिसांच्या प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 


महाराष्ट्र राज्य सुरक्षित आहे - देवेंद्र फडणवीस


अपहरण आणि हरवलेल्या मुली यांच्या संदर्भात वारंवार चर्चा सुरु आहे. पण यामध्ये परत येण्याचीही संख्या जास्त आहे. 90 टक्के  डिटेक्शन आहे तर महिला 86 टक्के आहेत.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं प्रमाण कमी आहे.  खुनाच्या गुन्ह्यात प्रती लाख पकडल तर महाराष्ट्र 20 व्या स्थानी आहे. खुनाचा प्रयत्न यामध्ये महाराष्ट्र 16 व्या स्थानी आहे. बलात्काराच्या विरोधात कठोर पावलं उचलली जात आहेत.मात्र जे चित्र रंगवले जात तसं  नाहीये. महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित राज्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय - देवेंद्र फडणवीस


सायबर गुन्ह्यांमध्ये 48.3 टक्के वाढ झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. दंगली संदर्भात 2020 मध्ये 9 हजार गुन्हे दाखल झाले. आता 8 हजार गुन्हे आहेत, याचा अर्थ या गुन्ह्यांमध्ये घट झालीये. ⁠मी मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांचं नागपूरवरचं प्रेम वाढत गेलं. पण त्यामुळे नागपूरला बदनाम करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 3 हजार 155 इतक्या संख्येने नागपुरातील गुन्हे कमी झाले. आता नागपूर याबाबतीत 23 व्या स्थानावर आहे मात्र अशा प्रकारे बदनाम करुन येणारी गुंतवणूक याला खिळ घातली जाते. जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम केलं जातंय, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


बलात्कारांच्या घटनेत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर, रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा; जयंत पाटलांचा हल्लाबोल