नागपूरः भाजपचं सरकार आलं तरी सर्व बलात्कार बंद होतील असं मी अजिबात म्हणत नाही. अशा घटना घडत असतात. मात्र जेव्हा जेव्हा बलात्काराची गंभीर घटना घडते, तेव्हा सत्तेवर असलेल्या सरकार त्या संदर्भात काय पावलं उचलतं, ते महत्त्वाचं राहतं. असल्याची प्रतिक्रीया भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या संदर्भात विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांची बोलणं करून निर्देश दिले असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.


पुढे वाघ म्हणाल्या, राज्यात अडीच वर्ष जंबो मंत्रिमंडळ होता. तेव्हा ही घटना घडत होत्या. तेव्हा कोणी विचारत नव्हतं, का त्या अडीच वर्षाच्या काळात एका मुलीला जिवंत जाळलं होतं. संबंधित जिल्हाधिकाऱ्यानी तसं लिहून ही दिलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारवाई झाली नाही नसल्याचा आरोपही त्यांनी लावला.


सरकारचे पूर्ण लक्ष


सरकार या प्रकरणी पूर्ण लक्ष ठेवून आहे. उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टरांसोबत बोलणं केले आहे. जर पीडीतेच्या पुढच्या उपचारासाठी गरज भासली तर तिला सुपर स्पेशलिटी उपचारासाठी इतर रुग्णालयात ही दाखल केले जाऊ शकते. नागपूरचे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पीडितेवर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया झाली आहे. तर पुढे आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र ती केव्हा होईल हे अजूनही निश्चित नाही. त्या शस्त्रक्रियेला काही दिवसांपासून काही महिन्याचा कालावधी लागू शकतो. पिडीतेचे शरीर उपचाराला कसे प्रतिसाद देतात त्यावर हे अवलंबित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने महिलेला मुरदोली च्या जंगलात डांबून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही या प्रकरणी पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.


नाना पटोले यांच्या व्हिडीओवर आजही ठाम


काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबत छायाचित्र असलेला व्हिडीओ ट्विट केला होता. याबद्दल विचारले असता नाना पटोले यांचा जो व्हिडिओ ट्विट केला होता. त्या प्रकरणी मी अजिबात बॅक फुटवर नाही आहे. नाना पटोले यांना न्यायालयात जायचे असेल तर त्यांनी जावे, असा दमही त्यांनी यावेळी दिला.