नागपूर : कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांना दिला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जंयत पाटलांवर टीका करता पातळी सोडल्याचं दिसून आलं. त्यानंतर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते."
यावर देवेंद्र फडणवीस बोलतील
अजित पवार म्हणाले की, "वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं आमचं धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे."
गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केल्याचं दिसून आलं. जयंत पटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या टीका केली. टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोपही केलेत.
जचंत पाटलांवर पातळी सोडून केलेल्या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसं? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
ही बातमी वाचा: