Nagpur Roads : कसा होणार शहराच्या रस्त्यांचा 'विकास', आमदारांच्या घरासमोरच साचते पावसाचे पाणी

अक्षय गांधी   |  अक्षय गांधी   |  24 Jul 2022 07:02 PM (IST)

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक वस्त्यांमधील घरातही पाणी शिरले. आता आमदाराच्या घरासमोरली रस्त्यावरही पाणी साचले असून प्रशासन त्यांच्या तक्रारीचीही दखल घेत नसल्याचे दिसून आले.

आमदार विकास ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरच पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागपूरः नागरिक आपल्या विविध समस्या घेऊन लोकप्रतिनीधींकडे जात असतात. मात्र आमदारांच्या घरासमोरच पावसाचे पाणी साचतो. यासंदर्भात नागपूर मेट्रो आणि महानगरपालिकेकडे तक्रार करुनही दोन वर्षांपासून प्रतिसाद भेटत नसल्याने आता सामान्य नागरिकांच्या तक्रारीबाबत प्रशासन किती गंभीर असेल हे या प्रकारावरुन समोर येत आहे. सुभाषनगर मेट्रोल स्थानकाला लागूनच आमदार विकास ठाकरे यांचे (MLA Vikas Thakre) निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावरच थोडे जरी पाऊस झाले तर पाणी साचतो. याचा चारचाकी वाहनांतर त्रास होतोच, सोबतच दुचाकी मधात बंड पडली तर त्याला पाण्यातून धक्का मारुन दुचाकी समोर ढकलून आणावी लागत असल्याचे चित्र आहे. 

हिंगणा-वाडी मार्गाचीही चाळण

सलग पडणाऱ्या दमदार पावसामुळे विदर्भातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अनेक ठिकाणी दुर्दशा झाली आहे. नागपूरच्या वेशीवरच वाडी परिसरात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ओळखता येणार नाही, एवढा खराब झाला आहे. काही काही पट्ट्यामध्ये तर मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता कुठे आणि खड्डा कुठे असा प्रश्न वाहन चालकांना पडतोय.

खड्डे रात्री ठरतात जीवघेणे

रस्त्यावर हात फिरवल्यावर उखडलेल्या खडीचे ढीग हातात येते. दिवसा नजरेस पडणारे खड्डे कसे तरी चुकवणे वाहन चालकांसाठी शक्य होते. मात्र रात्रीच्या वेळेला हेच खड्डे जीवघेणे ठरत आहे. गेले काही दिवस नागपूर ते वाडी दरम्यान अनेक दुचाकी वाहन चालक या महामार्गावर अपघातात जखमी झाले आहे. विदर्भातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या महामार्गावर दिवसभर लाखो वाहनांची ये-जा असल्यामुळे सतत वर्दळ असते. चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे हा महामार्ग दर्जेदार असणे गरजेचे आहे. मात्र, आता त्याच रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे गल्ली बोळातल्या रस्त्यांचे काय असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

निकृष्ट दर्जा, मार्गाची दुर्दशा

शहरातील हिंगणा मार्गाची (Hingna Road) दुदर्शा तर अनेक वर्षांपासून आहे. याठिकाणी दर महिन्याला विविध भागातील रस्ते पट्ट्यांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र काही आठवड्यातच त्याची चाळण होऊन जाते. कंत्राटदाराकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा तपासण्याची तसदीदेखील विभाग घेत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर मेट्रोच्या सुभाषनगर स्थानकाचे काम करण्यापूर्वी परिसरात आयआरडीपीची लाइन होती. त्याद्वारे पावसाचे साचलेले सर्व पाणी खालच्या दिशेने अंबाझरीलगतच्या नाल्यात वाहून जात होते. मात्र मेट्रोच्या स्थानकाच्या कामाच्यावेळी कंत्राटदाराने मेट्रोच्या पिलरखाली असलेली पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहीनी बंद केली. त्यामुळे गेल्यावर्षीपासून नागरिकांनाहा त्रास होतोय. या संदर्भात नागपूर मेट्रो आणि नागपूर महानगरपालिकेकडे (NMC) अनेकवेळा तक्रार देऊनही अद्याप प्रतिसाद मिळालेली नाही आहे.- विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर

Published at: 24 Jul 2022 07:02 PM (IST)
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.