मुंबई : सर्व सामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या ‘बेस्ट’ची अवस्था पाहून ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘बेस्ट’सारखी चांगली व्यवस्था संपवली जात असल्याबद्दल नगरकर यांनी राग व्यक्त केला आहे.


तसेच, बेस्टच्या खासगीकरणाचा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुंबईतील मोठी सार्वजनिक वाहतूक असलेली बेस्ट सेवा सध्या तोट्यात आहे. वेतन आणि अन्य सुविधा यावरुन वारंवार बेस्टचे कर्मचारी संपावर जातात. त्यावेळी एखादा तोडगा काढला जातो. मात्र, बेस्टची दुरावस्था काही संपायला तयार नाही. त्यामुळे नगरकर यांनी ‘बेस्ट’मधील अनागोंदी कारभाराबाबत मेहता यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी पत्रात काय म्हटले आहे?

“बेस्ट ही जुनी संस्था आहे. बेस्टचे मार्ग रद्द केले जात आहेत, भाडेवाढ केली जात आहे. भ्रष्टाचार करायला पैसे आहेत, बेस्टसाठी पैसे नाहीत, हा खोटेपणा आहे.”, असा घणाघात नगरकरांनी केला असून, याच पत्रात ते पुढे म्हणाले आहेत, “नुसतं राजकारण सुरु आहे, राजकीय नेते अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात आणि अधिकारी राजकारण्यांकडे.”

“इथे सगळे मोठे लोक आहेत, स्वर्गातून आल्यासारखे मोठ्या गोष्टी करतात, कोस्टल रोड आणि FSI वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी लोकांचाही विचार करावा.”, असा टोलाही नगरकर यांनी लगावला आहे. तसेच, जर बेस्टचं खासगीकरण केलं, तर मुंबईतील सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहनही नगरकरांनी केले.