मुंबई: छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदीबागेत (Modibaug) पोहोचल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसतो की काय, असे वाटत होते. त्या अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला का पोहोचल्या, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले नसल्याचे समोर आले आहे.  याबाबत अजित पवार यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या . अजित पवारांची (Ajit Pawar) बहीण नीता पाटील मोदीबागेत बी विंग मध्ये पाचव्या मजल्यावर राहतात . त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या, असे सुरज चव्हाण यांनी सांगितले.


सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 


सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्या तर गैर काय? भुजबळांचा सवाल


कालच शरद पवार यांची भेट घेणाऱ्या छगन भुजबळ यांना सुनेत्रा पवार मोदीबागेत गेल्या, त्याविषयी विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी म्हटले की, शरद पवार हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्यात तर गैर काय आहे? ते एकत्र आले तर चांगलं आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.


बारामतीच्या लढाईमुळे वितुष्ट


अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेतला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून परस्परांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते.


आणखी वाचा


राज्यसभा खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदा मोदीबागेत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण