मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा एटीएसने खुलासा केल्यानंतरही त्यांची सुरक्षा कमी का केली असा जाब विचारणारं पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.


आव्हाडांच्या खुनाच्या कटात सरकारचे संगनमत आहे काय? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाचं बरं-वाईट झालं तर याला पूर्णत: सरकार जबाबदार असेल, असंही मुंडेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसंच आव्हाडांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पाऊलं उचलावीत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पत्रात काय लिहिलं आहे?
जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करवी, यासंदर्भात मी यापूर्वीही तुम्हाला विनंती केली होती. त्यांच्या घराची रेकी झाल्याचंही सांगितलं. तरीही काही महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली. सुरक्षाव्यवस्था कमी करताना राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल विचारात घेतला जातो. एकीकडे एटीएसने न्यायालयात आव्हाड हिटलिस्टवर असल्याचं सांगूनही गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होत आहे.


एक विधानसभा सदस्या म्हणून साधी चौकशी करण्याचं सौजन्यही सरकारने दाखवलं नाही. सगळ्याच घटना पाहता सरकारच्या उद्देशाबाबत संशय निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आव्हाड यांच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, याकडे मी तुमचं लक्ष वेधत आहे. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत, ही विनंती.