जेव्हा मुंबईची लोकलच रस्ता चुकते...
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 07:53 AM (IST)
ही लोकल वाशीच्या दिशेने वळणं अपेक्षित होतं, मात्र ती वाशीच्या रेल्वे रुळावर न वळता वाद्र्यांच्या दिशेला वळाली.
मुंबई : रस्त्य्यावरुन कार किंवा पायी प्रवास करताना वाट चुकण्याची शक्यता असते, मात्र मुंबईची लोकलच रस्ता चुकल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? गुरुवारी रात्री मुंबई सीएसएमटी स्टेशवरुन निघालेली लोकल वाशीला जाण्याऐवजी वांद्र्याच्या दिशेने वळली आणि एकच गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरुन रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी निघालेली वाशी स्लो लोकल वडाळ्याच्या सिग्नलवरुन सुटली. ही लोकल आधीच 15 मिनिटे उशिराने धावत होती. सीएसएमएटीवरुन निघाल्यानंतर मस्जिद बंदर–सँडहर्स्ट रोड-डॉकयार्ड रोड- रे रोड- कॉटन ग्रीन- शिवडी हा प्रवास व्यवस्थित पार पडला. वडाळा स्टेशनवर या लोकलला सिग्नलला दिला जातो आणि तिथून या लोकलचा रेल्वे रुळ बदलतो. त्यातला एक रस्ता वांद्र्याला तर दुसरा वाशीला जातो. ही लोकल वाशीच्या दिशेने वळणं अपेक्षित होतं, मात्र ती वाशीच्या रेल्वे रुळावर न वळता वाद्र्यांच्या दिशेला वळाली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर ही बाब प्रवासी आणि मोटरमनच्या लक्षात आली आणि प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. रस्ता चुकलेली लोकल किंग सर्कल स्थानकावर थांबवावी लागली. या स्थानकावर लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटं थांबवावी लागली. यावेळी प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. चुकीचा सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे रुळ चुकल्याचं मोटरमनने सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर ही लोकल वांद्रा ते वाशी अशी करण्यात आली. कधीही रस्ता न चुकणाऱ्या मुंबई लोकलच्या या सावळ्या गोंधळामुळे दिवसभर काम करुन थकलेल्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.