‘आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’, खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2018 02:37 PM (IST)
‘आपल्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य निघालेलं नाही, मग आता सरकार त्या आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?’, असा थेट प्रश्न एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
मुंबई : प्रशांत परिचारक यांचं निलंबन, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर झालेला पक्षपातीपणाचा आरोप या मुद्द्यांबरोबरच आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी त्यांच्यावरच्या आरोपांबाबत सरकारला जाब विचारला. ‘आपल्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य निघालेलं नाही, मग आता सरकार त्या आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?’, असा थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. ‘बेछूट आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे चौकशी केली जाते, त्याचप्रमाणे त्यात काहीही आढळलं नाही. तर आरोप करणाऱ्यांवर तातडीची कारवाई झाली पाहिजे.’ असं खडसे म्हणाले. खडसे यांच्यावर भोसरी इथं स्वस्तात जमीन लाटल्याचा आरोप झाला. याप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते पक्ष आणि नेतृत्वावर निशाणा साधतात. मुख्यमंत्र्यांचं खडसेंना उत्तर : दरम्यान, खडसेंच्या सवालावर मुख्यमंत्र्यांनीही सभागृहातच उत्तर दिलं. ‘तथ्यहीन आरोप करुन लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील.’ असं मुख्यमंत्री म्हणाले. संबंधित बातम्या :