मुंबई : मुंबईकरांना लवकरच समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन नवी मुंबई गाठता येणार आहे. भाऊचा धक्का ते नेरुळ या मार्गावर जलवाहतुकीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.


2018 पर्यंत या जलावाहतुकीला सुरुवात होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नूतनीकरण करण्यात आलेल्या भाऊच्या धक्क्यावरील प्रवासी थांब्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

भाऊच्या धक्क्याहून प्रवास करताना बोटीची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय, तसंच खाद्य पदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह अशा सुविधा असतील. यातून चारचाकी हलकी वाहनंही नेता येणार आहेत.

मुंबईहून अलिबाग किंवा रायगडपर्यंत स्वतःच्या वाहनाने कमी वेळेत आणि अल्प खर्चात पोहचणं शक्य होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टसह राज्यभरातील बंदर विकासमंडळाकडे असलेल्या जमिनीसंदर्भात नितीन गडकरींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.