भिवंडी : भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय 50 वर्ष ), भगवान मामा ( वय 55 वर्ष ), मनसुख भाई ( वय 45 वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत .  


भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता. कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती व त्यावर काम सुरु होते.


 मात्र हे काम सुरु असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रा देखील खाली कोसळला. या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.