पालघर : खराब रस्त्यांमुळे वाडा-भिवंडी रस्त्यावर आठवडाभरात तीन जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी रात्री वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यांमुळे दोघा तरुणांना जीव गमवावा लागला आहे, तर एक जण जखमी आहे.


 
शनिवारी रात्री आंभईजवळ खड्डयात अडकलेली बाईक काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना मागून येणाऱ्या टेम्पोनं धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांच्या नातेवाईकांनी वाडा-मनोर रस्त्यावर रास्तारोको केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

 
हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला बांधण्यासाठी दिला. या रस्त्यावर सुप्रीम कंपनी टोलवसुली करते, मात्र निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामामुळे तीन वर्षात 138 जणांचे बळी गेले आहेत, तर दीड हजाराहून अधिक वाहनस्वार जखमी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

 

खड्ड्यात बाईक आदळून टिटवाळ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू


 

खड्ड्यात बाईक आदळल्यामुळे गेल्या आठवड्यात 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात घडली होती. विजय केंद्रे असं मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव होतं.

 
एचडीएफसी बँकेत असिस्टंट मॅनेजरपदावर कार्यरत असलेले विजय केंद्रे रात्री 7.45 च्या सुमारास कामावरुन घरी परतत होते. यावेळी भिवंडी बायपास कोन रोडला त्यांची बाईक खड्ड्यात आदळली. त्यामुळे त्यांचा तोल गेला. त्याचवेळी मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरुन गेला.

 

केंद्रेंच्या हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात विजय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन  बचावला.