विरार : वसई-विरारमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात मागील पाच दिवसात दोन महिलांची हत्या झाली. विशेष म्हणजे या महिलांचे मृतदेह एकाच पद्धतीने जाळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.


विरारजवळच्या कनेर भागातील जंगलात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. महिलेची आधी हत्या करुन तिचा मृतदेह जाळल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेह पूर्ण जळाला होता, केवळ कवटीच दिसत होती.

तर त्याआधी रविवारी विरारमध्येच एका महिलेचा मृतदेह अशाच पद्धतीने जळालेल्या अवस्थेत सापडला होता. दोन्ही घटनांनी वसई-विरारमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद करुन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पण दोन्ही महिलांची ओळख अजूनही पटलेली नाही. तसंच कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती लागलेले नाहीत.