मुंबई : पालघर जिल्ह्यातील विरार (पूर्व) भागात मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री भीषण अपघात घडला. येथे रमाबाई अपार्टमेंटची चार मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अद्याप 20 ते 25 लोक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. घरामध्ये आनंदांचं उत्साहाचं वातावरण होतं, दरम्यान अचानक इमारतीचा एक भाग कोसळला आणि मोठा मलबा खाली आला. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) तसेच स्थानिक प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या VVMC रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही इमारत जुन्या बांधकामाची असल्याने काही दिवसांपासून तिच्या भिंतींमध्ये भेगा पडल्या होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सलग पावसामुळे भेगा अधिक रुंद झाल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या मलबा हटवून लोकांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपार्टमेंटमध्ये सुमारे 12 कुटुंबे वास्तव्यास होती. दुर्घटना घडल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या विंगला तातडीने रिकामे करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी इमारतीला सील केले असून पुढील धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना सावध करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, इमारतीच्या देखभालीकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले होते. वारंवार सूचना करूनही दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, बचाव पथकाला मलब्याखालून आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजून किती लोक जिवंत आहेत याचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका अधिकारी, तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
प्रशासनाकडून जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत, वडीलही मलब्याखाली दबल्याची भीती
या दुर्घटनेबाबत मिळलेल्या माहितीनुसार, या इमारतीत जोयल कुटुंबातील एक वर्षीय चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. त्यानिमित्ताने परिसरातील आणि मित्र परिवार सर्वजण घरी एकत्रित जमले होते. मात्र अचानक ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे सध्या मलब्याखाली दबले गेले आहेत. सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम बचावकार्य करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाड आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे.
संजीवनी हॉस्पिटल : जखमी
1.संजय स्वपन सिंग
2.मिताली राजेश परमार
यांना मुंबईच्या खार रोड येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.
प्रकृती हॉस्पिटल बोलिंज : जखमी
1.प्रदीप कदम
2.जयश्री कदम
3.विशाखा जोयेल.
4.मंथन शिंदे
5. आरोही ओंकार जोयल (वय 24 ) - ही मयत झाली आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा : जखमी
प्रभाकर शिंदे
प्रमिला प्रभाकर शिंदे
प्रेरणा प्रभाकर शिंदे
जीवदानी हॉस्पिटल चंदनसर
उत्कर्षां ओंकार जोयल (वय 1 वर्ष) ही मयत झाली आहे.