मुंबई : राज्यातील बहुतांश संस्थाचालक ऑनलाईन शिक्षक भरतीविरोधात कोर्टात गेले आहेत. त्यामुळे भरतीवर रखडली आहे, असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. ते आज एबीपी माझाच्या 'ब्रेकफास्ट न्यूज' या कार्यक्रमात बोलत होते.


राज्यात 24 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा विनोद तावडे यांनी फेब्रुवारी महिन्यात एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात केली होती. मात्र अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. शिक्षक भरतीच्या आश्वासनाचं नेमकं काय झालं, असे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

'माझा कट्टा'वर विनोद तावडे काय म्हणाले?


विनोद तावडे म्हणाले की, "शालेय शिक्षक भरतीची प्रोसेस सुरु केली. पण यानंतर  काँग्रेस-राष्ट्रवादीचे संस्थाचालक कोर्टात गेले. तारखा पडू लागल्याने शालेय शिक्षकभरती रखडली. आम्ही सगळी तयारी करुन ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन ठेवले आहेत. ज्या क्षणी कोर्टाचा निकाल येईल, त्या क्षणी ताबडतोब आम्ही भरती करु शकतो. 'कट्ट्या'वर घोषणा केली तेव्हा हे संस्थाचालक कोर्टात जातील हे मला माहित नव्हतं.

"सोशल मीडियावर शिक्षक भरतीसंदर्भातील बातम्या शेअर होतात. त्यातलं पहिलं ट्वीट राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडून होतं. ते सगळीकडे फिरतं, मग बाकीचे ते शेअर करतात. पण जे खरे शिक्षक विद्यार्थी आहेत, त्यांची आम्ही संपर्कात आहोत. कोर्टाचा निर्णय झाल्यावर भरती होणार हे 100 टक्के," असंही विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितलं.