मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी कथित हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केली. गुरुवारी विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली होती. सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला होता.


विखे पाटील यांनी काल राज्यपालांना पत्र लिहून गृहखात्याविरुद्ध चौकशी आणि कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली.

आपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, “हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग आहे.”

“सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, असा गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत असून,  ही बाब संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य नाकारण्यासारखीच आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेत्याला अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्लेषदायक आहे.”, असे विखे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

संबंधित बातमी : ‘सरकार विरोधकांवर पाळत ठेवत आहे’, विखे-पाटलांचा गंभीर आरोप