वसई : वसई-विरार पोलिसांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ या अनोख्या मिशनची सुरुवात केलीय. या मिशनमध्ये त्यांनी शहरातील दुकानदार, मॉल्स, बॅंका आणि सोसायट्यांना यांना आपल्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचं आवाहन केलंय. मात्र एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने फिरवण्याचं आवाहनही केलंय. या संकल्पनेचं वसई-विरारमधील नागरीकांनीही स्वागत केलंय.


वसई-विरार शहराची जवळपास 30 लाख लोकसंख्या आणि एका पोलीस ठाण्याचा गुन्ह्याचा आलेख हा महाराष्ट्रातील एका जिल्ह्याएवढा आहे, अशा वसई-विरार शहरात सात पोलीस ठाणे आहेत. मात्र झपाट्यानं  शहरीकरण वाढणाऱ्या या शहरात चेन स्नॅचिंग, पोलीस बनून तोतयागिरी, मोटार कार चोरी, चोरी, दरोडा, खून, बलात्कार यांसारख्या गुन्ह्याचा आलेख वाढतच जातोय. त्यातच पोलिसांची कमी संख्या आणि त्यातच वाढत जाणारी टेक्नॉलॉजी यामुळे या टेक्नॉलॉजीचा फायदा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करण्यासाठी पोलिसांना एक नामी शकल्ल लढवली आहे.

‘एक कॅमेरा शहरासाठी’ या मिशनची संकल्पना नव्याने नियुक्त झालेले अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांची आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे शांतता कमिटी मिटिंग, मोहल्ला कमिटी मिटिंग, गणेशोत्सव मिटिंग, तसेच दुकान, मॉलमध्ये जाऊन व्यापारी वर्गाला आपल्या दुकानात स्वतःच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला कॅमेऱ्यात एक कॅमेरा शहराच्या दिशेने लावण्याच आवाहन करत आहेत. त्याला व्यापारी वर्गानेही खुल्या मनाने मदत करण्याच ठरवलं आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक यांनी ही संकल्पना प्रथम अकोला शहरात राबवली होती. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि नव्याने वसई-विरार शहराचा पदभार घेतल्यावर विजयकांत सागर यांनी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही संकल्पना वसई विरार शहरासाठी राबवायची ठरवली. सध्या वसई विरार शहरात दिडशेहून अधिक व्यापारी गृहनिर्माण संस्था, शाळा कॉलेज यांनी एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावला आहे.

नव्याचे नऊ दिवस राहू नये म्हणून, प्रत्येकाने लावले कॅमेराची देखभाल किंवा ते व्यवस्थित आहेत का याचीही तपासणी पोलीस करणार आहेत. कारण याच सीसीटीव्हीच्या मदतीतून गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे.