मुंबई : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर अधिक ताण पडू नये म्हणून तिथला किमान 450 मेट्रिक टन कचरा देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकू देण्याची मागणी मुंबई महापालिकेच्यावतीने हायकोर्टाकडे करण्यात आली आहे. यावर देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुमारे 450 मेट्रिक टन कचरा जमा करण्यासाठी किती जागा लागेल? असा सवाल हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला केला आहे.


कारण 450 मेट्रिक टन कचरा टाकण्यासाठी तब्बल 120 एकरची जागा कशाला हवी? असा प्रश्‍न याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात उपस्थित केला आहे. त्यावर हायकोर्टानं याबाबतचा तपशील नकाशाच्या आधारे सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असून यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई शहर-उपनगरांमधील ओला-सुका कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडवर जमा करण्यात येतो. मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्याचे काम महापालिकेने पूर्णपणे बंद केले आहे. मात्र सध्या या भागामध्ये सुमारे 72 लाख मेट्रिक टन कचरा जमा झालेला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाले आहे. परंतु एकूण कचऱ्याचे आकारमान पाहता या कामास किमान सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकिल अनिल साखरे यांनी हायकोर्टाला दिली.

मुंबईतील डंपिंग ग्राऊंडच्यासंदर्भात पांडुरंग पाटील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. पालिकेला मुंबईसाठी नवं डंपिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावात जमिन मिळाली आहे. मात्र अद्याप राज्य सरकारकडून या जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रियाच सुरु आहे.