मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. आघाडीतील तीन जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरु आहे. नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु आहे.


नंदुरबारच्या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे. तर अहमदनगरची राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेसला हवी आहे. येत्या 15 जानेवारीला दिल्ली दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.


पुणे, यवतमाळ, रत्नागिरी या जागा काँग्रेसकडे राहणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातील औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. त्याठिकाणी सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.


अहमदनगरच्या जागेवरुन दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली. मात्र अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे 15 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत आघाडीची तिढा सुटण्याची आशा व्यक्त केली जात आहे.