सत्तेत येण्याची खात्री नसल्याने आश्वासने दिली : नितीन गडकरी
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2018 09:54 AM (IST)
'कलर्स मराठी' चॅनलवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमातील नितीन गडकरींचा ही मुलाखत आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. यामध्ये गडकरींसह अभिनेते नाना पाटेकरही पाहुणे म्हणून आले होते.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेलं विधान पक्षासाठी डोकंदुखी ठरु शकतं. टोलमुक्तीच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "आम्ही सत्तेत कधीच येणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठमोठी आश्वासनं देण्याचा सल्ला दिला होता." त्यांचं हे विधान म्हणजे विरोधकांना आयतं कोलीत मिळाल्यासारखं आहे. भाजप आणि पर्यायाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आयती संधीच आहे. "मी दोन-तीन गोष्टींबाबत मी देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मुंडे यांना टोलबद्दल काही बोलू नका असं सांगितलं होतं. सध्या याबाबता काही जाहीर करु नये, अशा भूमिकेत मी होतो. पण आमचा काय प्रॉब्लेम होता हे मी सांगतो. आमचा सगळ्यांचा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता की आयुष्यात कधी आम्ही राज्यावर येतच नाही. त्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक म्हणायचे, बोला ना, सांगा ना बिघडतंय काय? तुमच्यावर कोणती जबाबदारी येणार आहे. आता आमचं राज्य आलं. कोणत्या तारखेला गडकरी काय बोलले? फडणवीस काय बोलले? जनता आम्हाला त्या आश्वासनांची आठवण करुन देते, मात्र सध्या आम्ही त्यावर हसतो आणि पुढे जातो," असं गडकरी म्हणाले. 'कलर्स मराठी' चॅनलवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमातील नितीन गडकरींचा ही मुलाखत आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. यामध्ये गडकरींसह अभिनेते नाना पाटेकरही पाहुणे म्हणून आले होते. नितीन गडकरींच्या या टिप्पणीवर विरोधी पक्ष काँग्रेसने त्वरित ट्वीट केला आहे. या ट्वीटनुसार, "गडकरी यांनी सिद्ध केलं की भाजप सरकार जुमले आणि खोट्या आश्वासनांवर स्थापन झालं आहे." इतकंच नाही तर खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावर ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "तुम्ही अगदी बरोबर आहात. जनताही आता असाच विचार करतेय की, सरकारने त्यांच्या अपेक्षा आणि विश्वासाचा वापर पक्षाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला आहे."