उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी 'साई' पक्षाचे जीवन इदनानी विराजमान झाले आहेत.


महापौर निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिवसेनेनं सभात्याग केला होता. 'साई' पक्षाच्या गटनोंदणीवर शिवसेनेने हरकत घेतली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हरकत फेटाळल्यामुळे शिवसेनेने सभात्याग केला. शिवसेनेने साई पक्षाच्या नोंदणीविरोधात थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे निवडणुकीत मोठी रंजकता निर्माण झाली होती.

उल्हासनगर महापौरपद निवडणूक, 'साई'विरोधात शिवसेनेची याचिका


उल्हासनगर महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपाला टीम ओमी कलानीच्या सहाय्याने 33 जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा 39 असल्यामुळे भाजपानं 11 जागा निवडून आणणारा साई पक्ष आणि दोन अपक्षांच्या साथीनं संख्याबळ 46 वर नेलं.

उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या चार, रिपाइंच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 32 वर गेलं. बहुमत गाठण्यासाठी सेनेला सात नगरसेवकांची गरज पडणार होती.

उल्हासनगर महापौर निवडीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का


निवडणुकीत भाजपसाठी किंगमेकर ठरलेल्या साई पक्षाने कोकण विभागीय आयुक्तांकडे आपली गटनोंदणी करताना पक्षाची घटना न लावल्यानं कोकण आयुक्तांनी साई पक्षाची आपल्याकडे महापालिकेतील पक्ष म्हणून नोंदच नसल्याचं पालिका प्रशासनाला कळवलं होतं.

त्यानंतर साई पक्षाने आपली घटना सादर केली आणि कोकण आयुक्तांनी आपला निर्णय बदलला. मात्र निर्णय बदलणं गैर असल्याचा आरोप करत शिवसेनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र अखेर भाजपच्या बाजुने कौल गेल्याने उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपचा महापौर बिनविरोध विराजमान झाला.