मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आज मुंबईत मोर्चा काढला. त्याआधी आझाद मैदानात भाजपच्या नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सवाल विचारले. "एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल की अशाप्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता, ज्याने मुंबईच्या चिंधड्या चिंधड्या केल्या, त्यावेळी काय उत्तर द्याल?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला आश्चर्य वाटतं, नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय, शरद पवार म्हणतात देणार नाही. उद्धवजी पण म्हणतात देणार नाही. उद्धवजी तुमचं आमचं जमत नाही, तुम्ही तिथे सरकार चालवा, तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ. पण माझा तुम्हाला सवाल आहे, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल की अशाप्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता, ज्याने मुंबईच्या चिंधड्या चिंधड्या केल्या, त्यावेळी काय उत्तर द्याल? त्यावेळी आम्ही बाळासाहेबांना सांगू आम्ही संघर्ष केला. पण काय करायचं आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते आणि ते सत्तेकरता एवढे आंधळे झाले की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहित होती की राजीनामा मागितला तर कदाचित माझं सरकार जाईल."


नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस
"हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले. दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हा कट रचला. या हरामखोरांनी नवाब मलिकांना जमीन विकली, मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटत चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का?" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


'दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाही'
ठनवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. काल आम्ही तुमचं पितळ उघडं केलं आहे. मोदींना संपवण्याकरीता तुम्ही सर्व एकत्र येता आहात. आमचे संबंधी गुन्हेगारांशी नाही. कालचा बाॅम्ब पहिला बाॅम्ब आहे. अजून अनेक बाॅम्ब येतील. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. पोलिसांनी अटक केली तर काही होत नाही. शांत राहा. यांनी राजीनामा घेतला नाही तर अजून अनेक गोष्टी बाकी आहे, अजून संघर्ष बाकी आहे. रस्ता रोको करायचा नाही. आपण दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाहीदाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे. 1993 साली मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी हसीना पारकर, सलीम पटेलनं षडयंत्र रचलं. मलिकांनी आरोपीकडून जमीन विकत घेतली. 25 रु चौरस फुटाने ही जमीन विकत घेतली, हसीना पारकरने बॉम्बस्फोटाचा कट रचला. ईडीजवळ मलिकांवरोधात पुरावे आहेत. दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे," असे मागणी फडणवीसांनी केलीय.