मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी योग्यवेळी खांदेपालटाचा निर्णय घेऊ असा शब्द आमदारांना दिला आहे. आज गुरुवारी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.


सध्या राज्य मंत्रीमंडळात असलेल्या रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि दीपक सावंत या मंत्र्यांवर या बैठकीत आमदारांनी नाराजी व्यक्त केली. पक्षबांधणी बळकट करायची असेल, तसंच ग्रामीण भागात सेनेचं वर्चस्व वाढवायचं असेल तर खांदेपालट आवश्यक असल्याचा सूर सेनेच्या आमदारांकडून लावण्यात आला. यावेळी "तुमच्या भावनांचा मी आदर करतो, मात्र आज ती वेळ नाही. योग्य वेळी मी निर्णय घेईन," असा शब्द उद्धव ठाकरे आमदारांना दिला.

या बैठकीत आमदारांनी विधान परिषदेऐवजी विधानसभेतून मंत्री द्यावेत अशी मागणी केली आहे. बैठकीवेळी अर्धा तास आमदारांच्या भावना उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतल्या. यावेळी मंत्र्यांना वेगळ्या खोलीत बसवले होते. त्यानंतर मंत्र्यांना आणि आमदारांना आमने-सामने बसवून उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. मंत्र्यांनी या बैठकीत काहीही बोलणं टाळलं. मात्र आमदारांच्या निधीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालटाची चर्चा, अनेक मंत्र्यांना डच्चू?

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक

उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र