ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' प्रदान करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला.


सावरकरांना 'भारतरत्न' मिळालं पहिजेच, जगाला समजायला हवं की भारतात कोणतं रत्न जन्माला आलं आहे. सावरकरांच्या साहित्याचा वारसा आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगताना उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली.

हिंदू म्हणजे लढवय्या असला पाहिजे. बाळासाहेब आणि सावरकरांमध्ये साम्य म्हणजे दोघंही हिंदूंसाठी लढले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दहशतवाद्यांना बडवणारे हिंदू पाहिजेत, देवळात घंटी बडवणारे हिंदू नकोत, असं सांगताना जे काम अनेक जन्म घेऊन आपण केले नाही, ते काम एका जन्मात सावरकरांनी केलं, असंही उद्धव म्हणाले.

सर्वच थोर पुरुष आपल्या महाराष्ट्रात जन्मले, त्यांनी देशात नाव उंचावलं. महाराष्ट्रात जोपर्यंत अशी बीजं आहेत, तोपर्यंत आपण खूप पुढे आहोत. हा वारसा पुढे घेऊन जाणं, हे आपलं कर्तव्य आहे. सावरकर भारतात जन्मले हे आपल्या देशाचं भाग्य आहे, असं म्हणत 'ज्याचे 'कर' देशाला 'सावर'तात, ते सावरकर' अशा शब्दात उद्धव यांनी सावरकरांचा गौरव केला.

मी 3 वर्ष संमेलनाला येतोय, पण अजूनही मला सावरकर समजले नाहीत. सावरकर प्रेमींना ते किती समजले, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्या वेळचे तुरुंग आणि आताचे तुरुंग, यात खूप फरक आहे. सत्तेत आहोत, तोपर्यंत आपण सावरकरांचे विचार आणि त्यांचे साहित्य मुंबईत ठेवू. वाचून दाखवण्यापेक्षा त्या वस्तू आपण लोकांसमोर आणू, क्रांती मनात झाली तर ती देशासाठी पुढे उपयोगी ठरेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.