घाटकोपर (मुंबई ) : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सामोरे यावे. दोघांनाही एकदाच निपटून काढतो, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.


वारंवार पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘पंतप्रधान मोदींआधी माझ्याशी निपटा,’ असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. घाटकोपरमध्ये आज उद्धव ठाकरेंनी आज प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत

राज्यात आणि केंद्रात आम्ही भाजपसोबत सत्तेत आहोत, पण वारंवार होत असलेले मनभेद आणि मतभेद पाहता अशा प्रकारच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची वेळ आलीय, असं म्हणून उद्घव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला. ते आज गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीनंतर दुपारी पत्रकारांशी बोलत होते.

घाटकोपरमधील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

- हार्दिक पटेल येऊन गेल्यामुळे काहींच्या पोटात गोळा आला

- आमच्या पायाखालची वाळू घसरली तर तुमचं काय घसरलं ते बघा, स्वतःच घसरू नका म्हणजे झालं

- आम्हाला फक्त निपटायचा धंदा आहे का, एक एक निपटत बसायचं?

- दोघे एकत्र या एकत्र निपटतो. विधानसभेला जसे एकत्र आलात तसे सगळे एकत्र या, सगळ्यांना एकत्र निपटतो.

- मान खाली घालू असं एकही काम शिवसेनेने केलं नाही.

- कौतुक नको, पण किमान वेडेवाकडे आरोप करू नका

- नागपूरमधला भ्रष्ट कारभार कमी आहे का? नागपुरात खड्डे नाही का?

- व्यापारी म्हणतायेत, एकही भूल, कमल का फुल.

- तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून नोटाबंदीसारखा दरिद्री निर्णय घेतला