मुंबई : दुसरीकडे मनसेच्या मोर्च्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. आपल्याला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेनं कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आमदारांची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसीबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं.


या बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना करण्यात मार्गदर्शन आलं. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकं म्हणत आहेत की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस सोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडलंय, पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असं ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray | ... अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल : राज ठाकरे 


मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेलं आहे. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारलं जाणार आहे. जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन नियोजन करणार आहोत.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेने महामोर्चा आयोजित केला होता. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघाला. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी घुसखोरांवर हल्लाबोल केला.  आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. इथून पुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.