भिवंडी : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील एका गॅरेजच्या छतावर झाड कोसळलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, तर सहा कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.


इमरान अंसारी (18) आणि लल्लन यादव (50) या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर रामनरेश साहू (30), ईस्माईल खाँ (22), बरसातीलाल साहू (30) ,वकिल खाँ (22) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान आणखी दोन जखमींची नावं अजून समजू शकलेली नाहीत. या जखमींना उपचारासाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र रामनरेश आणि ईस्माईल या दोघांची  प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.

सायंकाळच्या सुमाराला अचानक विजांचा गडगडाट सुरु होऊन वादळी पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिला आणि नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. तर भंडारी कंपाऊंड, नारपोली ,शास्त्रीनगर, कामतघर अशा विविध ठिकाणच्या रस्त्यांवर झाडं उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली.