मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईची लोकल सलग रखडतच चालली आहे. मात्र, लोकल रखडण्याचा अनुभव ताजा असतानाही रेल्वे प्रशासनानं मात्र येत्या पावसाळ्यात मुंबई लोकल थांबणार नाही, असा दावा केला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील मान्सूनपूर्व कामे शंभर टक्के पूर्ण झाली असल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे.
दरवर्षी पावसाळा आला की पहिल्या मोठ्या पावसातच लोकल रखडते, असा मुंबईकरांचा आतापर्यंतचा अनुभव आहे.
मात्र, पावसाळ्यापूर्वीच अनेकदा रखडणारी लोकल यंदा रखडणार नाही, असा आत्मविश्वास दाखवत मान्सूनपूर्व कामे ही समाधानकारक झाली आहेत, असं रेल्वे प्रशासन म्हणतं आहे.
तसेच, ट्रॅकच्या आजूबाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागल्यानं हार्बर रेल्वेच्या मार्गावरील केबल्स जळून हार्बर रेल्वे रखडली होती, असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन पाहणीसाठी स्पेशल ड्राईव्ह घेऊन उपाययोजना करणार आहे.