मुंबई :  एमएमआरडीएचे आयुक्त आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ आय ए एस अधिकारी आर ए राजीव यांची ईडी कडून टॉप सिक्युरिटी प्रकरणी चौकशी करण्यात आली. सुमारे सात तास ही चौकशी चालली. टॉप सिक्युरिटी आणि एमएमआरडीएच्या संबंधाबद्दल ही चौकशी होती. तर एमएमआरडीएच कामकाज कसं चालत हे समजून घेण्यासाठी बोलावलं असल्याचे आर ए राजीव यांनी सांगितलं.


टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावलं होत. त्यानुसार बरोबर 12 वाजता आर ए राजीव ईडी कार्यलयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली.


काय होते प्रकरण?


टॉप सिक्युरिटीला 2014 ते 2017 या कालावधीत ट्रॅफिक वॉर्डन अर्थात सिक्युरिटी गार्ड पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट 500 गार्ड पुरवण्याचं होत. मात्र, कंत्राट मिळाल्यावर टॉप सिक्युरिटीकडून केवळ 70 टक्के म्हणजे 350 गार्ड पुरवले. उरलेल्या गार्डची बोगस बिल काढून त्यांचे पैसे लाटले जात होते. ईडीच्या तपासात टॉप सिक्युरिटीला हे कंत्राट मिळवून देण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं म्हटलं आहे. तर टॉप सिक्युरिटी ला कंत्राट मिळून देण्यात अमित चंडोले यांचा ही महत्त्वाचा रोल होता. त्याने एजेंट म्हणून काम केलं आहे. अमित चंडोले हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने काम करायचे तर टॉप सिक्युरिटीच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्ट एम शाशीधरण हे काम करायचे.


ईडीच्या तपासात सुरुवातीला टॉप सिक्युरिटी कडून एम शाशीधरण हा पैसे वाटायचं काम करायचे तर इतरांच्या वतीने अमित चंडोले हे पैसे स्वीकारायचे, हे तपासात उघडकीस आलं. यामुळे अमित आणि शाशीधरण या दोघांना अटक झाली. ते अजूनही जेलमध्येच आहेत. या अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या तपासात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना कुणाला किती पैसे दयायचे, याबाबत चर्चा व्हायची आणि त्याच्या संभाषणाची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याना उपलब्ध झाली आहे.


मात्र एमएमआरडीएचे काम कसं चालतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बोलावलं असल्याचं आरे ए राजीव यांनी सांगितलं. तर एमएमआरडीएकडून क्लिनचीट दिलं नसल्याचंही आर ए राजीव यांनी स्पष्ट केलं.


उद्या एमएमआरडीएचे जॉइंट कमिशनर बी जी पवार आणि अरमान जैन या दोघांना ही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे हा तपास कुठल्या दिशेने जातो आणि यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणी पुन्हा वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहेत.