नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर गेल्या 4 दिवसांपासून नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रेल्वेसेवा ठप्प झाली होती. नाशिकवरुन सुटणाऱ्या 30 पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या. मात्र कामाची गती पाहता रेल्वे ट्रॅक आजही सुरळीत होण्याची चिन्हं कमी आहेत. दरम्यान अपघातानंतर दुरांतोचे सर्व डबे हटवण्यात आले. तसंच पावसामुळे बिघाड झालेल्या 35 लोकलही आज पुन्हा मार्गावर आल्या आहेत.
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरुन अपघात झाला होता. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फूट अंतरावरील टेकडीवर जाऊन आदळले.