ठाणे : ठाण्यात गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेने प्रत्येक पालिका निवडणुकीत ठाणेकरांना विकासकामे करण्याचे वचन दिले होते. मात्र दिलेल्या 40 आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेली नाही त्यामुळे ठाणेकरांची फसवणूक झाली आहे आणि याचीच जाणीव ठाणेकरांना व्हावी यासाठी ठाण्यात मनसेच्या वतीने हजारोंच्या संख्येने भव्य जनजागरण मोर्चा  गुरुवारी काढण्यात आला होता. ठाण्यातील मासुंदा तलाव ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं आयोजन मनसे नेते अभिजित पानसे, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते. या मोर्चात हजारो मनसैनिक रस्त्यावर उतरून आपला सहभाग नोंदवला होता. 


गेली दहा वर्ष जी वचन सत्ताधाऱ्यांनी दिलेत त्यातील एक ही वचन पूर्ण केली नाहीत, याच्या विरोधात हा मोर्चा आहे. यापुढे प्रत्येक चौकात फलक घेऊन उभे राहून लोकांना पटवून देऊ की तुमची कामे पूर्ण झाली नाही, तुम्हाला दिलेली वचन सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली नाहीत असे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, पालिका निवडणुकीत शिवसेना भावनिक मुद्द्याला हात घालते आणि त्यामध्ये ठाणेकर मतदात्याची फसवणूक केली जात आहे. कधी हिंदुत्व तर कधी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मुद्दा पुढे करतात. फक्त निवडणुकीतच यांना दिघे आठवतात असा आरोप यावेळी मनसेच्या नेत्यांनी या मोर्चात केला. खोटी आश्वासने दिली जात असून त्यांच्या विरोधात आम्ही नेहमी बोलत आहोत आणि यापुढे बोलत राहणार असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.


ठाणे पालिकेची स्वतंत्र धरण व्यवस्था नाही, अद्याप करमाफी झाली नाही, सुसज्ज रस्ते नाहीत, जल वाहतूकाचा खोळंबा झाला असून सत्ताधाऱ्यांनी ठाणे शहर भकास केले आहे. आम्ही प्रश्न विचारत आहोत मात्र याचे उत्तर देण्यासाठी कोणी तयार नाही. दरम्यान कोरोना काळात देखील यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला.


संबंधित बातम्या :