2013 मध्ये (त्यावेळी) 17 वर्षांच्या तरुणीचं अपहरण करुन बलात्कार केल्याचा आरोप 22 वर्षीय तरुणावर करण्यात आला होता. मात्र बचावपक्ष अपहरण, बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत येणारे आरोप सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्याचं न्यायमूर्ती एएस भैसरे यांनी स्पष्ट केलं.
काय होता आरोप?
ठाणे जिल्ह्यातील वाड्याचा रहिवासी असलेल्या आरोपीने 17 जानेवारी 2013 रोजी त्यावेळी 17 वर्षांच्या असलेल्या पीडितेचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. आरोपी त्यावेळी 22 वर्षांचा होता.
पीडितेच्या म्हणण्यानुसार 17 जानेवारी 2013 रोजी ती स्वतः आरोपीसोबत तिळसा गावात गेली. तिथल्या देवळात त्यांनी लग्न केलं आणि दोघं नवरा-बायकोप्रमाणे रहायला लागले.
'आरोपीने पीडितेच्या मनाविरुद्ध तिला कुठेही नेलं नाही, तिचं अपहरण केलं नाही किंवा तिच्या संमतीशिवाय तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, असं उलटतपासणीत सिद्ध झालं. सध्या तिला आरोपीपासून एक मुलगा असून दोघं त्यांच्या घरात आनंदाने राहत आहेत.' असं जजनी सांगितलं.
आरोपीने तिला अवैधरित्या शारीरिक संबंध ठेवण्यासाठी किंवा लग्नासाठी भुलवलं नाही. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे अपहरण आणि बलात्काराचा आरोप चुकीचा असल्याचंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं. त्यामुळे आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली.