मुंबई: सध्या सोशल मीडियावर सुमारे पाच मिनिटांची कविता चांगलीच गाजत आहे. सोलापूरच्या अकुंश आरेकर या विद्यार्थ्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून, देशातील आजच्या परिस्थितीवर बोट ठेवलं. ‘बोचलं म्हणून’ या कवितेद्वारे अंकुशने मोदी सरकारवर आसूड ओढले आहेत. त्याने शेतकऱ्यांचं दु:ख आपल्या कवितेतून सरकारला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बोचऱ्या शब्दात अंकुशने सरकार आणि राजकाऱ्यांना फटके लगावले आहेत. अंकुशच्या या कवितेला सोशल मीडियात खूप दाद मिळत आहे. अंकुशची ही कविता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवर खूपच फॉरवर्ड होत आहे.

“लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून,

आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी,

मला तुम्हाला विचारायचंय,

अशा ‘दानवां’ना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी”

अशी कवितेची सुरुवात करुन, अंकुशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर -

 "काळ्या ढेकळाच रान, काळ्या डांबरानं माखलं,

आम्ही आडोसा मागितला, यांनी लवासाचं स्वप्न दाखवलं",

या अंकुशच्या ओळी राजकारण्यांना चपराक लगावतात.

 “अहो 56 इंच काय, माझा बाप 112 इंच छाती फुगवतो,

करतो काय तर इमानदारीने जगतो आणि इमानदारी शिकवतो”

या ओळींनी सभागृह टाळ्यांनी कडाडलं. पुढे “चहावाला सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी..., अहो विकला असेल चहा, म्हणून देश विकायचा असतो का”,  या त्याच्या सवालाने उपस्थितांनी अंकुशला अक्षरश: डोक्यावर घेतलं. कोण आहे अंकुश आरेकर? अंकुश आरेकर हा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकतो. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी गावचा आहे. लहानपणापासूनच कवितेची आवड असलेल्या अंकुशने अनेक कविता लिहिल्या आहेत, मात्र ‘बोचलं म्हणून’ या कवितेने तो प्रकाशझोतात आला आहे. अंकुशने ही कविता दहा दिवसांपूर्वी 12 सप्टेंबरला पिंपरी-चिंचवडमधील अंकुशराव लांडगे सभागृहात सादर केली. गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातील सात कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये अंकुशने ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर अंकुशची कविता सर्वांसमोर आली. VIDEO: