ठाणे : अनैतिक संबंधातून जन्माला येणारी मुलं श्रीमंतांना विकणाऱ्या टोळीचा ठाण्यात पर्दाफाश करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सहा महिलांसह आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


अनैतिक संबंध किंवा अत्याचारातून जन्माला आलेलं बाळ संबंधित महिलेला विकायचं असल्यास त्याची व्यवस्था करणारी टोळी सक्रीय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशी केल्यावर सोलापूरची राखी रणधीर बाबरे ही या टोळीची सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

राखीने गरजू महिला हेरण्यासाठी झोपडपट्टी भागांमध्ये हस्तक नेमले होते. इतकंच नाही, तर ती स्वत: कंत्राटी पद्धतीने मातृत्व (सरोगसी) स्वीकारत असल्याचंही तपासात उघड झालं आहे. गरजू शोधण्यासाठी सरोगसीवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समध्येही आरोपीने हस्तक तयार केले होते.

पोलिसांनी या प्रकरणी राखीसह हरजिंदर धरमसिंग गिल, कावेरी राज दास, नीलम अनिल सिरसाट, मोहिनी किरण गायकवाड, जनाबाई शेषराव खोतकर, मंगल बाळासाहेब सुपेकर आणि संतोष रामदास गायकवाड यांना अटक केली.

एक आणि सहा महिन्यांची दोन नवजात बालकं विकण्याच्या तयारीत आरोपी असताना पोलिसांनी कारवाई केली.
दोन्ही बालकांची व्यवस्था नेरुळ येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.