Cold Weather : देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.


राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. 


राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ
महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha