मुंबई : एनआयए मनसुख हिरण हत्या  (Mansukh Hiren Murder Case) प्रकरणातील मुख्य दुवे जोडण्यात NIA ला यश  आले आहे. नुकत्याच अटक केलेल्या चार आरोपींनी NIA समोर 4 मार्च रोजी संध्याकाळी मनसुखच्या हत्येच्या दिवसाचा तपास यंत्रणेसमोर खळबळजनक खुलासा केला आहे. 



4 मार्च रात्री जेव्हा मनसुखची हत्या झाली तेव्हा नक्की काय-काय घडलं?


4 मार्च रोजी सुनील माने पांढर्‍या फोक्सवॅगन कारमध्ये ठाण्याकडे निघाले आणि आपला फोन ऑफिसमध्येच ठेवला ज्यामुळे नंतर तपास यंत्रणाची दिशाभूल करता येईल. सुनील माने यांनी वांद्रे येथून त्याच्या मित्राकडून ही गाडी घेतली होती.


माने यांनी आधी सचिन वाझेंना कळवा स्टेशन येथून पिकअप केले. जिथून वाझेंनी काही रुमाल विकत घेतले होते. इन्स्पेक्टर तावडे असल्याचे भासवत मानेने सायंकाळी 8.40 च्या सुमारास मनसुखला व्हाट्सअॅपवर फोन केला आणि त्यांना माजिवडा जंक्शन येथे भेटायला बोलवलं. त्यानंतर वाजे व माने यांनी रात्री 9 च्या सुमारास मनसुखला माजीवाडा  जंक्शनवरून गाडीत बसवले.  एनआयएच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे की सुनील माने  कार चालवत होते तर वाझे शेजारी बसले होते.  मनसुख मागच्या सीटवर बसले होते. 


रात्री साडेनऊच्या सुमारास हे तिघेही (माने, वाझे व मनसुख) घोडबंदर रोडवरील गायमुख जवळ पोहचले. जिथे 5 इतर आरोपी लाल तवेरामध्ये वाट पहात होते. या सर्व जणांना एनआयएने अटक केली आहे. ज्यात आताच अटक केलेल्या चौघांचा समावेश आहे. पांढऱ्या गाडीतून खाली उतरुन लाल तवेरा कारमध्ये बसवण्यात आलं आणि त्या लाल तवेरामध्ये मनसुखची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मनसुखचा मृतदेह मुंब्रा खाडीमध्ये टाकण्यात आला. मनसुखची हत्या केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने वाझे आणि शर्मा यांना फोन करून काम झाल्याची माहिती दिली.


त्याच दरम्यान मानेने वाझेंना स्टेशनवर सोडले व वसईकडे गेले. जिथे त्याने मनसुखचा फोन व एक सिम कार्ड नष्ट केले तर दुसरे सिम तुंगारेश्वरजवळ नष्ट केले. त्यानंतर माने यांनी आपल्या कार्यालयात कॉल केला आणि आपल्या कनिष्ठला आपला मोबाईल फोन आणि बॅग त्याच्या निवासस्थानी पाठवायला सांगितले. जेथे माने थेट वसईहून पोहचले. वाझे यांनी काझीला आपला फोन घेऊन येण्यास सांगितले होते आणि एका बारमध्ये त्या रात्री तपास यंत्रणा चुकवण्यासाठी सचिन वाझेंनी एका बार मध्ये छापा टाकला होता.


प्रदीप शर्मासह या सर्व आरोपींशी आता एनआयएला समोरासमोर बसूनचौकशी करायची आहे. तसेच दोन आरोपींची मुदतवाढ देखील मागणार आहे ज्यांचा रिमांड आज संपत आहे.